शित्तूर – आरळा पुलावरचे पाणी खाली गेल्याने सर्व प्रकारची वाहतूक पूर्ववत
*वारणा धरणातून होणारा विसर्ग कमी 7311 ने सुरु,वारणेचा पुर हळूहळू ओसरू लागला, पाण्याखाली गेलेले पूल आणि रस्ते वाहतुकीसाठी झाले खुले*
शित्तूर – वारुण ( शिवाजी नांगरे) वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची तीव्रता कमी झाल्याने वारणा धरणातून सुरु असलेल्या विसर्गात कमी करून दिनांक 21/08/2025 रोजी वक्र द्वाराद्वारे 5681 क्युसेक्स विसर्ग व विद्युत गृहातून 1630 क्युसेक असा एकूण 7311 क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणातून येणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने वारणेचा पूर हळू – हळू ओसरू लागला आहे. पुराचे पाणी कमी झाल्याने पाण्याखाली गेलेले शित्तूर – आरळा, आणि चरण – सोंडोली हे पूल आणि रस्ते वाहतुकीसाठी खुले होऊन दळण – वळण पूर्ववत झाले आहे. वारणा धरण प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पाण्याच्या सुयोग्य नियोजनामुळे सण 2025 सालात पुराच्या पाण्यामुळे रस्ते, पूल, आणि नदीकाठची पिके जास्तकाळ पाण्याखाली राहिली नाहीत, तसेच दळणवळण पूर्ववत होऊन अवघ्या दोन ते तीन दिवसात पुरस्थिती ओसरली. इथूनमागे तब्बल पंधरा ते वीस दिवस पुरस्थिती जैसे थे असायची.चालू वर्षी मात्र वारणा धरण प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे प्रतीवर्षीची पुनरावृत्ती टळल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

